नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वनमजुरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
मुंबई : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमाने लावलेली आग विझवताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत. मृत मजुरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या दोन वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ९७,९८,९९,१०० येथे आग लागल्याची घटना दिसून आल्यानंतर जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर आग विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आलीही, परंतु वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वन वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी वन मजुरांचा मृत्यू झाला.
मृत्यू पावलेल्या वन मजूरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४०, राहणार थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५, राहणार धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय २७, राहणार कोसमतोंडी) या हंगामी वनमजूरांचा समावेश आहे.
तर विजय तीजाब मरस्कोले (वय ४०, राहणार थाडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया), राजू शामराव सयाम (वय ३०, राहणार बोरुंदा, जिल्हा गोंदिया) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अज्ञात इसमाने लावलेल्या आगीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!