डोंबिवलीत अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून
डोंबिवली: अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. विशेष म्हणजे पती बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नीने केली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करीत या गुन्ह्याची उकल करत पत्नी व तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारास अटक केली आहे.
प्रवीण पाटील (३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी प्रवीण पाटील, अरविंद ऊर्फ मारी रवींद्र राम व सनी सागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मानपाडा येथील त्रिमूर्ती अपार्टमेंट येथे राहणारे प्रवीण पाटील हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी लक्ष्मी हिने ४ जूनला मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. याचा मानपाडा पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी लक्ष्मी हिला बोलावले असता, तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. दरम्यान, तिच्या संपर्कातील अरविंद ऊर्फ मारी रवींद्र राम व सनी सागर यांची चौकशी केली असता अरविंदचे लक्ष्मीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले.
प्रवीण हे लक्ष्मीवर संशय घेऊन तिला त्रास देत होते. त्याची माहिती लक्ष्मीने २ जूनला अरविंदला दिली असता, तो प्रवीण यांच्या घरी गेला व त्यांना घेऊन स्वत:च्या घरी आला. अरविंदच्या घरी लक्ष्मीला पाहून प्रवीण यांना राग आला. पती-पत्नीमध्ये तेथे भांडण सुरू झाले. यावेळी अरविंद आणि सनी यांनीही लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत प्रवीण यांचा गळ्यावर चाकूने वार करून ठार मारले. मध्यरात्री प्रवीण यांचा मृतदेह चटईमध्ये गुंडाळून रिक्षाने शेलू गावाजवळील मोरीखाली टाकून दिल्याची माहिती तपासात उघड झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून यांनी सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!