अनैतिक संबंधाच्या संशयातून सुरक्षारक्षकाचा खून करणारे आरोपी अटकेत
पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेवर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा खून केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) जुबेर पापा इनामदार (वय ३७, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय २३, रा. चांदतारा चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी कचरु नागदिवे (वय ५०, रा. उरुळी देवाची) या सुरक्षारक्षकाचा खून झाला होता़ तर, रिक्षाचालक बालाजी भिमा चव्हाण (वय ३५, रा. पीर वस्ती, वडकीगाव) हे जबर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागदिवे हे उरुळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. तर चव्हाण हे रिक्षाचालक आहेत. नागदिवे यांची ५३ वर्षाची मैत्रीण ही येवलेवाडी येथील एका जमिनीची देखभाल करते. डोंगराजवळ असलेल्या प्लॉटींगमध्ये तिचे घर आहे. नागदिवे हे तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी चव्हाण याच्या रिक्षात जात. त्यामुळे प्लॉटींगवर सुपरवायझर असलेल्या ऋषीकेश गायकवाडसह इतरांना नागदिवेचे संबंधित महिलेशी गैरसंबंध असून सार्इटवरील खोलीचा वापर गैरकृत्यासाठी करत असल्याचा त्यांना संशय होता. त्यातून नागदिवे आणि बालाजी यांना सुपरवायझरने भेटण्यासाठी येवलेवाडी येथील त्या प्लॉटच्या ठिकाणी बोलविले.
आणि “तुम्ही आमचे जागेत लफडे करण्यासाठी येता बाहेरुन बाया घेऊन येता आणि येथे लफडे करता तुम्हाला आता सोडणार नाही,” असे म्हणून त्यांनी दोघांना लाकडी बांबुने डोक्यात, हातापायावर बेदम मारहाण केली. त्यात रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांनी दोघांना बालाजीच्या रिक्षात घालून उंड्री चौकात आणले. तेथे दोघांना रिक्षात सोडून ते पळून गेले. त्यानंतर या दोघांना रुग्णालयात नेले असताना रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. बालाजी चव्हाण यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत तपास करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!