लग्नाला 50 तर अंत्यविधीला फक्त 20 लोकांना परवानगी ; राज्य सरकारची नवीन नियमावली
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होत आहेत.30 डिसेंबर 2021 रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानंतर, नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी काही महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटचं संकटही गडद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल गुरुवारी तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात काल 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे.
राज्यात काल 198 ओमायक्रॉनबाधितांची नोंद –
राज्यात काल, गुरुवारी 198 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 450 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्यण
लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!