- May 12, 2026
- No Comment
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक

प्रतिनिधी : सचिन गाडे
पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारात भाजीपाल्याच्या गोण्या, मालाचे ढीग आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती असूनही अपेक्षित ग्राहकवर्दळ दिसून येत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज पहाटेपासून गजबजणारे मार्केट यार्ड सध्या तुलनेने शांत दिसत असून अनेक विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत आहेत. बाजारात भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध असला तरी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महागाई, बदलते हवामान, किरकोळ विक्रेत्यांकडील मंदावलेली मागणी तसेच थेट शेतकरी विक्री केंद्रांकडे ग्राहकांचा वाढता कल ही ग्राहकसंख्या घटण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने अनेक व्यापाऱ्यांना माल कमी दरात विकण्याची वेळ येत असून आर्थिक फटका बसत आहे.



