- February 19, 2025
- No Comment
पिंपरी चिंचवड महापालिकेने सात दिवसात फिरवला 4111 व्यवसायांवर बुलडोझर; नागरिकांचा रोष

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसामधीस अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडला आहे. या परिसरातील बांधकामे, शाळा, उद्यान यासह अनेक छोटे, मोठे उद्योगधंदे यांच्यावर हतोडा पडला आहे, यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत.
एकीकडे देशामध्ये रोजगार वाढावेत, नवीन उद्योग सुरू व्हावेत, यासाठी नवनवीन योजना सुरू केल्या जात आहेत. स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील चिखली, कुदळवाडी परिसरातील उद्योगधंदे उद्ध्वस्त करण्यात आल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 4111 उद्योगांवर अनधिकृत म्हणत बुलडोझर फिरवण्यात आला आहे. भंगारांच्या दुकाने कारवाईचा फार्स करून अनेक स्ट्रार्टअप उध्वस्त केल्याची माहिती आहे.
जागभरात पिंपरी-चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून आहे. एमआयडीसीत जागा उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसरात नवीन छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली-कुदळवाडी परिसरात रोहिंग्यांचे कारण दाखवून अनधिकृत शेड, भंगार मालाची दुकाने यावर कारवाई असल्याचे सत्ताधारी राजकीय पक्षांनी दाखवल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
या परिसरामध्ये 8 फेब्रुवारीपासून कारवाई सुरू झाली होती. ती 14 फेब्रुवारीपर्यंत चालली. त्यामध्ये 3 कोटी 60 लाख 58 हजार 746 स्केअर फुटांची बांधकामे उद्ध्वस्त केली. त्यात अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले. दहा, बारा, तीस मीटरचे पाच रस्ते आणि जकातनाका, शाळा उद्यान अशी, आरक्षणे मोकळी केली आहेत.
कारवाई झालेल्या परिसरामध्ये भंगार दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केले होते. त्यानुसार साडेतीन हजार नोटीसही देण्यात आल्या होत्या. नोटिसा देऊनही केवळ दीडशे लोकांनी उपाययोजना केल्याचं समोर आलं होतं. उर्वरित उद्योगांनी नोटिसांना गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे कारवाई केली आहे, असे भासवले जात होते. जवजवळ चार हजार उद्योग, धंदे उदध्वस्त होऊनही कारवाई विषयी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि विरोधी पक्षांपैकी कुणीही जाहीरपणे भूमिका घेतली नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
कारवाईची कारणे
1) कंपन्या व भंगार मालाच्या गोदामांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढतं आहे.
2) रासायनिक कंपन्या आणि भंगार माल, रद्दी यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या.
3) अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे आगीची घटना घडल्यास घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या.
4) महापालिका विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने, मैदाने, क्रीडांगणाच्या आरक्षणांवर अतिक्रमणे झाली होती.




