- December 25, 2024
- No Comment
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश

पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिले. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे मंदावलेल्या कामांनी आता पुन्हा वेग घ्यावा, अशी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची अपेक्षा आहे.
हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून महिन्यात बैठक घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यांनी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठका घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानंतर काही प्रस्तावांना गती मिळाली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा वेग मंदावला होता.
या पार्श्वभूमीवर, उदय सामंत यांनी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनबरोबर मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सामंत यांनी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने मांडलेल्या १७ मुद्द्यांचा आढावा घेतला. त्यात आयटी पार्कमधील पर्यायी रस्ते, उड्डाणपूल, घनकचरा प्रकल्प यांचा प्रामुख्याने समावेश होता. यातील काही विषय मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडित असल्याने त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.
पिंपरी-चिंचवडमधील समस्यांवरही चर्चा
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील समस्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबित आहे, याकडे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे यांनी लक्ष वेधले. यावर उद्योगमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना हे दोन्ही प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचा मुद्दा खूप काळापासून प्रलंबित आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासह इतर अनेक मुद्दे आम्ही मांडले होते. याबाबत उद्योगमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली. पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिले.




