- December 26, 2024
- No Comment
लज्जास्पद! राजगुरूनगरमधून गायब झालेल्या २ बहिणींची हत्या,धक्कादायक कारण आलं समोर

पुणे: पुण्यामध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. राजगुरूनगरमधून गायब झालेल्या २ चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घराबाहेर खेळणाऱ्या या दोन्ही बहिणींचे अपहरण करण्यात आले होते.
शेजारी रहाणाऱ्या आचाऱ्याने चिमुकल्यांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपलं कृत्य बाहेर समजेल या भीतीने त्याने दोन्ही मुलींची हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने राजगुरुनगर हादरले आहे. घराच्या वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीने या दोन चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकल्या मुलींनी आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपीने दोघींची हत्या केली.

दुर्वा मकवाणे (८ वर्षे) आणि कार्तिकी मकवाणे (९ वर्षे) अशी हत्या झालेल्या बहिणींची नावं आहेत. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले अन तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
आता आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील एका ड्रममध्ये दोघींचे मृतदेह ठेवले. राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
पण या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या. तर दोन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल.





