- December 29, 2024
- No Comment
सदाशिव पेठेत भिंतीवरील रंगांचा वाद! हिरव्या रंगावर दिला भगवा रंग, नेमकं प्रकरण काय?

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीवर हिरवा रंग देत फुले, अगरबत्ती, आणि चादर ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरात चर्चा आणि राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी दखल घेतली असून त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हिंदू समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?
सदाशिव पेठेत भिंतीवरील रंगांचा वाद! हिरव्या रंगावर दिला भगवा रंग, नेमकं प्रकरण काय?सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील एका गल्लीमध्ये हिरव्या रंगाने रंगवलेली भिंत आणि त्यावर ठेवलेली हार, फुले, चादर, व अगरबत्ती हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी स्थानिक नेते संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि दातेरे यांच्या सोबत हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला. यानंतर सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
या घटनेवरून मेधा कुलकर्णी यांनी म्हटले की, “पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. स्थानिक स्तरावर हिरव्या रंगाचा वापर करून अशा ठिकाणी पूजा करण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा विस्तार केला जातो.”
त्यांनी हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन करत म्हटले, “आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याकडे सजगपणे लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रकार लहान स्वरूपात सुरू होतात, पण नंतर त्याचा विस्तार होतो. म्हणून आपण वेळेत कृती करणे आवश्यक आहे.”
सदाशिव पेठेतील ही घटना पुणेकरांसाठी धक्कादायक होती. अनेकांनी यावरून संताप व्यक्त केला असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला आहे. मात्र, काहींनी या मुद्द्यावरून सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील या प्रकारामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “काल सदाशिव पेठेतील घटनेने मला खूप काही सांगितले. आपल्या परिसरात अशा गोष्टींना थारा देणे योग्य नाही. आम्ही यावर ठोस कृती केली आणि भगवा रंग चढवला. हा फक्त रंगाचा मुद्दा नाही, तर आपल्या संस्कृतीचा सन्मान टिकवण्याचा प्रश्न आहे.”




