- January 3, 2025
- No Comment
तुम्ही “रेशन कार्ड-आधार’ लिंक केले का?पहा सविस्तर

पुणे: राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती ग्राह्य धरली जात आहे. आतापर्यंत सुमारे १४ लाख ग्राहकांची माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. हे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते.
त्यामुळे ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार जोडणीसह हातांचे ठसे दुकानांमध्ये द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा शाखेकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची अद्ययावत माहिती सध्या गोळा केली जात आहे. त्यासाठी “ई-केवायसी’ अर्थात ग्राहकाची माहिती शिधापत्रिकेला जोडली जात आहे. त्यात आधार क्रमांक व हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. आपण ज्या रेशन दुकानातून धान्य घेतो, त्याच ठिकाणी दुकानदारामार्फत ही प्रक्रिया केली जात आहे.
यातून बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा बसणार आहे. तसेच धान्य वितरणातील गळती रोखण्यासाठीही “ई-केवायसी’ करण्यात येत आहे. जिल्ह्यात ६ लाख ३० हजार ८५४ शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकांमध्ये एकूण २६ लाख ६० हजार २२३ सदस्य आहेत. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांच्या किमान एका सदस्याचे अर्थात १०० टक्के शिधापत्रिकांना आधार जोडणी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील स्थिती:
जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर १६ लाख ९३ हजार ५८२ सदस्यांचे “ई-केवायसी’ पूर्ण करण्यात आले आहे. एकूण संख्येच्या हे प्रमाण ६३.६६ टक्के इतके आहे. त्यात सर्वाधिक ७३ टक्के “ई-केवायसी’ शिरूर तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहे. तर सर्वांत कमी ४५ टक्के प्रमाण मुळशी तालुक्यात झाले आहे.
“ई-केवायसी’ केल्यानंतर शिधापत्रिका अद्ययावत होते. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत अशा योजनांचा लाभ घेताना शिधापत्रिकेवरील माहिती मागितली जाते. शिधापत्रिकेवर असलेल्या माहिती जुळणी झाल्यानंतर या योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे ही माहिती देणे फायद्याचे ठरणार आहे.




