- January 10, 2025
- No Comment
गणेश कसबेने ज्या रस्त्याने रॅली काढली त्याचं रस्त्यावरुन पोलिसांनी काढली त्याची धिंड
पुणे: पुण्यात सध्या गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
गुंडांवर पोलिसांची दहशत राहिलेली नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्याचं नुकतच एक उदहारण समोर आलं होतं. मोक्कातील आरोपीने येरवडा जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढली होती. मोक्कातील आरोपी गणेश कसबेने समर्थकांसह पुण्यात रॅली काढली होती. या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. मोक्का असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनाधास्तपणे रॅली काढण्याची हिम्मतच कशी होते? अशी टीका पुणे पोलिसांवर सुरु झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी या टीकेला कृतीमधून उत्तर दिलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. ज्या रस्त्याने गणेश कसबेने रॅली काढली. त्याचं रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. गुन्हेगारांवर दहशत बसावी व सर्वसामान्यांमध्ये भिती राहू नये यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललं.
या प्रकरणी मोक्कातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली. येरवडा पोलिसांनी रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका दिला. पुणे पोलिसांनी आरोपींची धिंड काढण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींची धिंड काढली आहे. पण पुणे शहरात गुन्हेगारी कमी झालेली नाही. वाहनांची तोडफोड, लुटमार, हत्या असे प्रकार सुरुच आहेत.
पुण्यात काही गोष्टी घडत आहेत, हे खरे आहे. मात्र, त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे, असे म्हणणे योग्य नाही. शहरात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष असून यापूर्वीच्या घटनांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गुन्हे वाढू नयेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुरंदर विमानतळ, जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प, कोल्हापूर महामार्गाबाबतही त्यांनी भाष्य केले. त्यावेळी पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे का, असे विचारले असता त्यांनी गुन्हेगारी वाढले असे म्हणणे योग्य नाही, असे स्पष्ट केले.