- March 8, 2025
- No Comment
पुण्यातील ‘तो’ हिरे व्यापारी घरी परतला, चक्क स्वत:च केला होता अपहरणाचा बनाव

पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातून एका हिरे व्यापाराचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी समोर आली. अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यापाराच्या मोबाईलवरून पत्नीला फोन केला आणि २ करोड रुपये तयार ठेवा असं सांगून मोबाईल स्विच ऑफ केला.
दरम्यान, दोन तास उलटून गेल्यानंतरही फोन न आल्यानं पत्नीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली. तिथल शहा असं या व्यापाराचं नाव आहे.
मंगळवारी पुण्यात संध्याकाळी ज्या दुचाकीवरून ते नवले पुलाजवळ गेले होते त्या ठिकाणाहून त्यांची दुचाकी पोलिसांना आढळून आली. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणातून मुंबई गाठली. मात्र तरी सुद्धा तिथल शहा तेथे मिळून आले नाही. अखेर तीन दिवसांनी शहा यांनी स्वतः बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. तिथल शहा यांनी हे कृत्य आर्थिक नैराश्यामधून केल्याचं आता समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी पुण्यातील १० ते १२ लोकांकडू व्याजाने पैसे घेतले होते. ते व्याजाचे पैसे देणे न झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी त्यांच्या कुटुंबाला अपहरणाचा खोटा कॉल करून, नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून रावेत येथे आणि रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई गाठली. त्यानंतर बॉम्बे सेंट्रल इथे एक दिवस लॉजवर, खार वेस्ट मुंबई येथे लॉजवर दोन दिवस आणि एक दिवस विलेपार्ले येथे ते राहिले.
लोकांनी दिलेल्या त्रासामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण पोलिसांना दिलं आहे. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.




